नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार….
आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा हा देशात अभुतपूर्व ठरला आहे. दोन दिवसीय या मेळाव्यात ६७ हजार ३७८ उमेदवारांनी नोंदणी केली असून यापैकी ११०९७ उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नोंदणी झालेल्या उर्वरीत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसरात आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दटके, विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संचालक दिगांबर दळवी, शिवानी दाणी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपीटल : स्टार्टअप सुरू करण्यात महाराष्ट्र अन्य राज्यांपेक्षा पुढे आहे. आऊटलूक कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू झाले असून महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपीटल आहे. विशेषत: ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण, मार्केट लिंकेज देणारे स्टार्टअप देखील सुरू झाले आहे.