राज्यात लवकरच मेगाभरती; तब्बल इतक्या जागांसाठी नोकर भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.गेल्या काही दिवसांत सरकारी नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न वाढतच चालला आहे.. दुसरीकडे राज्यातील विविध सरकारी विभागात रिक्त जागांची संख्या मोठी आहे.नोकर भरती होत नसल्याने सध्याचा कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण येत होता.राज्यातील 42 विभागांत तब्बल पावणे तीन लाख जागा रिक्त असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने राज्यात लवकरच ‘मेगाभरती’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात तब्बल 2 लाख 75 हजार जागांसाठी ‘मेगाभरती’ होणार आहे.

दोन टप्प्यात ‘मेगाभरती’
राज्यातील कृषी, गृह, जलसंपदा, महसूल आणि वन, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यांसह विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होत होता. कोरोनामुळे राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारने भरतीवरील निर्बंध मागे घेतले आहेत.
राज्यातील 42 शासकीय विभागांत तब्बल पावणे तीन लाख जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदांमधील अनेक विभागांचा पदभार एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविला आहे. त्यामुळे एका कर्मचाऱ्यावरच कामाचा ताण वाढतोय. शिवाय, कामेही उरकली जात नाहीत. अधिकाऱ्यांविना अनेक कामे रखडली असून, नागरिकांचा खोळंबा होत होता.
विभागनिहाय रिक्त जागा
गृह विभाग– 49 हजार 851
सार्वजनिक आरोग्य विभाग– 23 हजार 822
जलसंपदा विभाग– 22 हजार 489
महसूल व वन विभाग– 13 हजार 557
वैद्यकीय शिक्षण विभाग 13 हजार 432
सार्वजनिक बांधकाम विभाग– 8 हजार12
आदिवासी विभाग– 6 हजार 907
सामाजिक न्याय विभाग – 3 हजार 821

राज्य सरकारने वरील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आगामी काळात दोन टप्प्यात ‘मेगा भरती’ होणार आहे. तब्बल पावणे तीन लाख जागांसाठी ही नोकर भरती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजले. त्यामुळे अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होणार असल्याचे सांगण्यात आले.