राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ३३ टक्के गुणांचा नियम लागू; जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन पेपर १ (२०० गुण) आणि सामान्य अध्ययन पेपर २ (२०० गुण) या दोन पेपरपैकी सामान्य अध्ययन पेपर २ हा अर्हताकारी नियम लागू (क्वालिफाय) केला आहे. मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करण्यासाठी आयोगाने या पेपर २ मध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक केले आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर १ मधील गुणांच्या आधारे आता मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी यापुढे जाहीर करण्यात येणार आहे. यूपीएससीच्या धर्तीवर फायदा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ मधील निर्णय निर्धारण व समस्येचे निराकारण (डिसिझन मेंकिंग अॅण्ड प्रोब्लेम स्वॅल्विंग) चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरीता नकारात्मक गुणदान लागू राहणार आहे. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा तसेच एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे लिहिल्यास २५ टक्के गुण वजा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही, असे आयोगाने बुधवारी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा मराठी आणि इंग्रजी या माध्यमातून देता येणार आहे. परीक्षेची पद्धत वैकल्पिक (ऑब्जेक्टिव्ह) आहे.
