‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ, जाणून घ्या नवीन सवलती!
पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेज संदर्भात आता नवीन शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. सरकारने पहिल्या जीआरमध्ये समाविष्ट नसलेल्या भागांनाही आता मदत जाहीर केली आहे.
सुरुवातीला 29 जिल्ह्यांमधील 253 तालुक्यांचे नुकसान झाल्याचे नमूद केले होते मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनंतर सरकारने आज पुन्हा सुधारित GR काढला आहे. या नवीन निर्णयानुसार राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 347 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे मान्य करण्यात आले आहे.
या नवीन GR मध्ये विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात संपूर्ण माफी देण्यात आली आहे. विशेषतः 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ज्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळेल.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन जीआरनुसार राज्यायातील 34 जिल्ह्यांमधील 347 तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शेतकऱ्यांच्या जमीन महसुलात पूर्ण सूट देण्यात आली आहे.

सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी त्यांच्या तिमाही वीज बिलातही सूट किंवा माफी दिली जाणार आहे. याशिवाय, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या फीमध्ये पूर्णपणे माफी देण्यात आली आहे.