‘या’ योजनेला केंद्र शासनाची मंजुरी; आता यांना होणार फायदा
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या घोषणेनंतर 24 तासांच्या आत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ही योजना सुरू केली जाणार आहे.
सोनार, गवंडी, न्हावी, लोहार यासारखी कामे करणाऱ्या लोकांना मदत करणे हा केंद्राच्या या योजनेचा मुख्य उद्देश आहे. लाल किल्ल्यावरून घोषणा करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सुरुवातीला ही योजना 15,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केली जाईल आणि नंतर ती वाढवली जाईल. दरम्यान बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली.

या योजनेचा उद्देश या वर्गाला प्रशिक्षण आणि साधने उपलब्ध करून देणे हा असणार आहे. तसेच, विश्वकर्मा योजना सुरू केल्यानंतर केंद्र सरकार या योजनेची सविस्तर माहिती देईल. तसेच शहरात राहणाऱ्या, अनधिकृत वसाहतींमध्ये राहणारे आणि शहरात स्वत:चे घर बांधू इच्छिणाऱ्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठीही केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. लवकरच या योजनेशी संबंधित सविस्तर माहिती दिली जाईल.