बोर्डाचे ‘ते’ 6 गुण या विद्यार्थ्यांना मिळणार….
राज्यातील बारावी बोर्डाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितले होते. यानंतर काही तज्ज्ञांची बैठक झाली आणि आता 6 गुण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बोर्डाने घेतला आहे.

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील कवितेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल अशाच विद्यार्थ्यांना 6 गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रिटींग मिस्टेकमुळे त्या पेपरमध्ये मॉडेल अन्सरमधील उत्तरेच छापण्यात आली होती. प्रत्येकी दोन गुण प्रमाणे एकूण सहा गुणांचे हे तीन प्रश्न होते. हे प्रश्नच विद्यार्थ्यांना समजले नाहीत. हे प्रश्न आहेत की उत्तर याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मुख्य नियामकांनीही प्रश्नपत्रिकेतील चूकांप्रकरणी विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याबाबतचा अहवाल राज्य मंडळाकडे दिला होता.
उत्तरपत्रिकेमध्ये Poetry / Section-2 असा उल्लेख केला असल्यास किंवा विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर किंवा त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास विद्यार्थ्यांना हे गुण मिळणार असल्याची माहीती आहे.