Take a fresh look at your lifestyle.

MPSC बाबत मोठा निर्णय; क्रमवारीत ‘या’ विद्यार्थ्यांना देणार प्राधान्य…

0

एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदभरतीच्या परीक्षेत दोन विद्यार्थ्यांना एकसारखेच गुण मिळाल्यास क्रमवारी करताना अडचण येत होती. मात्र, आता ‘एमपीएससी’ कडून त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. ‘एमपीएससी’मार्फत केल्या जाणाऱ्या विविध पदभरतींसाठी उमेदवारांची अंतिम शिफारस यादी करताना, आतापर्यंत एकसमान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राधान्य क्रमवारी वेगळ्या निकषांद्वारे केली जात होती. मात्र, आता जुने निकष रद्द करून नव्याने नियम जाहीर करण्यात आले आहेत.

शिक्षण जास्त असणाऱ्यास प्राधान्य:- ‘एमपीएससी’तर्फे घेतल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षेत समान गुण मिळविणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्य क्रमवारीच्या निकषांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, आता ‘एमपीएससी’ परीक्षेत दोन विद्यार्थ्यांना एकसारखेच गुण मिळाल्यास, ज्याचे शिक्षण जास्त, त्याला क्रमवारीत प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या ‘एमपीएससी’ च्या सर्व जाहिरातींमध्ये ही बदल केले जाणार आहेत. शिवाय ‘एमपीएससी’च्या कार्यनियमावलीतही सुधारणा केली जाईल. त्यासाठी ठराविक कालावधी दिला जाणार असून, त्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे ‘एमपीएससी’कडून सांगण्यात आले.

नवे निकष काय:- – अर्ज करताना उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हा समान गुण मिळवलेल्यांसाठी पहिला निकष असेल.
– दोन्ही विद्यार्थ्यांचे समान गुण व समान शिक्षण असल्यास, तर अर्ज करण्यापूर्वी कोणाचे शिक्षण पूर्ण होते, हे पाहिले जाईल.
– परीक्षेच्या जाहिरातीत एखादी पात्रता नमूद केली असेल, ती पात्रता विद्यार्थ्यांकडे असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल.
– अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास वर्ग, भटके विमुक्त प्रवर्गातील उमेदवार, वय, आडनावातील आद्याक्षर या क्रमाने उमेदवारांची क्रमवारी केली जाईल.
– पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी क्रमवारी करताना, पदवी आणि अनुभव, बारावी आणि अनुभव व दहावी आणि अनुभव या क्रमाने क्रमवारी केली जाईल. या बदलांबाबतची माहिती जाहिरात, परिपत्रकात दिली जाईल.