Take a fresh look at your lifestyle.

अकरावीची दुसरी विशेष फेरी सुरु; निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर

0

राज्य मंडळाच्या दहावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी दुसरी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.

शुक्रवार (९ सप्टेंबर) पासून ही फेरी सुरु झाली असून ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचे भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार आहे. या फेरीसाठी निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर एक विशेष फेरी अशा एकूण चार फेऱ्या राबविण्यात आल्या; मात्र अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत तसेच राज्य मंडळाने घेतलेल्या फेरपरीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलतप्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. त्यासाठी या फेरीचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले.

या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचे भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल. त्यानंतर १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे तसेच प्रवेश रद्द करता येणार आहे. विशेष फेरीमध्ये दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, एटीकेटी सवलतप्राप्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या पूर्वी अर्ज भरलेले आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल.

विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याने नव्याने संमती देणे आवश्यक असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग दोन अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतिक्रम सुधारित करून अर्ज पुन्हा लॉक करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या https://pune.11thadmission.org.in/ या वेबसाइटवर मिळेल, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी सांगितले.