शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय: पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस समिती स्थापन!
पद्म पुरस्कार २०२७ साठी नावांची शिफारस; केंद्रासाठी राज्यात समिती स्थापन

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (राजशिष्टाचार) पद्म पुरस्कार २०२७ करिता मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. सदर निर्णय दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला असून, त्याचा क्रमांक पुरस्कार-१०२६/प्र.क.५१/राशि-२ असा आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे राज्य शासनामार्फत पद्म पुरस्कारांसाठी सुचविण्यात येणार आहेत. यासाठी गठीत करण्यात आलेली समिती शासनाकडे विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची सखोल छाननी करून पात्र मान्यवरांची निवड करणार आहे. त्यानंतर या नावांची अंतिम शिफारस केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल.
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित निवड प्रक्रिया सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०२६०४२४१२५७३७०३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आला असून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार अवर सचिव शिल्पा देशपांडे यांनी तो निर्गमित केला आहे.