Take a fresh look at your lifestyle.

कास्ट व्हॅलिडिटी आता मिळणार फक्त ८ दिवसात…

0

जात वैधता प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीनंतर जातीचा दाखला मिळतो. परंतु, विद्यार्थी हिताचा निर्णय घेत शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकलानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचे वेध लागतात. या प्रवेशांसाठी आणि त्यातील विविध आरक्षण आणि सवलती मिळवण्याच्या हेतूने विद्यार्थी आणि पालकांची जुळवाजुळव सुरु होते. पण, शासनाकडून विविध प्रमाणपत्र मिळवणायसाठी एकाचवेळी उडणार्‍या गर्दीमुळे अनेकदा सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांची पूर्तता करणे शासनालाही शक्य होत नाही. मात्र, आता ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमीत-कमी दिवसांमध्ये अगदी त्वरीतही दाखले मिळत आहेत.

दुसरीकडे आता जात पडताळणी कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात तर अधिकाधिक आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे. विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता, जात वैधता प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आता विद्यार्थी बार्टीच्या वेबसाईटला भेट देऊन जात वैधता प्रमाणपत्रकरिता अर्ज करू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याकडे शाळेचा पुरावा नसेल तरी असे विद्यार्थी आता उत्पन्नाचा पुरावा सादर करून बार्टीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित समिती आठ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. एवढेच नव्हे तर, एखाद्या विद्यार्थ्याला जर खूपच गरज असेल तर एका दिवसात देखील समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.

याकरिता समितीने माहिती देताना सांगितले आहे की, “विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्या कॉलेजमध्ये नाव नोंदणी करून कॉलेजमधील जे काही कागदपत्रे आवश्यक आहेत ते कागदपत्र घेऊन समितीकडे जाऊन जात वैधता प्रमाणपत्र करिता ताबडतोब अर्ज करणे गरजेचे आहे. या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार नाही किंवा तो नाकारला जाणार नाही याची काळजी समितीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे :- जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड पाहिजे.

ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असल्यास, त्या कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेटसह अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्याची सही-शिक्का व अर्जदाराचा फोटो असणे गरजेचे आहे.

तसेच, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा, जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला आणि वडील जर शिकलेले नसतील तर तसे शपथपत्र असणे गरजेचे आहे.

त्यासोबतच, अर्जदाराची आत्या व काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराच्या आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच गाव कर पावती, खरेदीखत, फेरफार उतारा, गहाण खत आणि मालमत्ता पत्रक इत्यादी महसुली पुरावे जोडणे गरजेचे असते.

शिवाय, महत्त्वाचे म्हणजे वंशावळ नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व यासाठी आवश्यक फॉर्म नंबर १७ ( शपथपत्र) इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.