Take a fresh look at your lifestyle.

आता रेल्वे स्थानकांवर ‘ही’ सुविधा सुरू होणार…

0

रेल्वेने दरोरज लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. अशातच केंद्र सरकारने रेल्वे प्रवाशांसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. औषधांसाठी रेल्वे प्रवाशांना आता स्थानकाबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण प्रवाशांना स्थानकांवरच जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात 50 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा सुरू होणार आहे.

यामध्ये राज्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस, पिंपरी, मालाड, मनमाड, सोलापूर, नागभीड या सहा स्थानकांचा समावेश आहे. केंद्र सरकारने नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता स्थानकातच प्रवाशांना औषधे मिळतील.

प्रत्येक स्थानकावर जनऔषधी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर जागा दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक रेल्वे विभागाकडून ई-लिलाव केला जाणार आहे. यातून रेल्वेला महसूल देखील मिळणार आहे. या जनऔषधी केंद्राची रचना अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनकडून केली जाणार आहे.