आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी पाच लाखांपर्यंत देणार बिनव्याजी कर्ज
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत मुला-मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी तसेच, पाच ते दहा लाखांपर्यंत दोन टक्के आणि दहा ते १५ लाखांपर्यंत चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (ता. १७) राज्य बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात कर्ज योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य बँकेने सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून जाहीर केलेल्या या योजनेचे कौतुक केले. राज्य बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांनी त्यांचे शिक्षण या योजनेद्वारे पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारला देय असलेल्या लाभांशाचा दहा कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले. बँकेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय बँकेच्या सेवक वर्गास असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी मंत्री विजय शिवतारे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. बँकेचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, सूत्रसंचालन उपसरव्यवस्थापिका डॉ. तेजल कोरडे यांनी केले.

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना
– कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क नाही.
– पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही
– अंतिम परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये रोख
– ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंत रोख पारितोषिक
– सन २०२३ पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाच लाभ.
– बारावीनंतर कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी योजनेस पात्र