Take a fresh look at your lifestyle.

‘या’ तारखेपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी….

0

राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.

मैदानी चाचणीच्या दृष्टीने प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानांची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे.

मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.

जेथे मैदानी तेथेच लेखी परीक्षा:– पोलिस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.