राज्यात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. ५ : राज्यात युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. या रोजगार मेळाव्यांची व्यापक माहिती गरजू तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रविंद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले, सदस्य सचिव तथा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ.अमित सैनींसह शासकीय सदस्य उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, आयटीआय व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हयात व तालुक्यात याची माहिती दिली जाईल. तरुणांना रोजगाराचे महत्व आणि स्वरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व एनजीओंच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल. पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एटीकेट (शिष्टाचार), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल. दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मंत्री लोढा म्हणाले की, केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व-प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण दिले जावे. उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल. या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी व प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समन्वय समिती व विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मेळावे यशस्वी करूया. समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवून रोजगार निर्मितीची प्रक्रिया अधिक व्यापक आणि परिणामकारक बनवण्यावर भर देण्यात यावा. समितीतील सर्व सदस्यांनी या मोहिमेत सक्रीय सहभागी होऊन युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊया.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी रोजगार मेळाव्यांच्या केलेल्या नियोजनसंदर्भात बैठकीत माहिती दिली. समितीच्या सदस्यांनी रोजगार मेळाव्यासंदर्भात सूचना केल्या.
संध्या गरवारे/विसंअ